वंचित इतिहासाच्या परिप्रेक्षातून दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान Contribution of women in the freedom movement of South Maharashtra : the perspective of deprived history
वंचित इतिहासाच्या परिप्रेक्षातून दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान
प्रस्तावना:
ब्रिटिश सत्तेच्या प्रभावातून भारतीय रूढी व परंपरेत बदल घडून आले. या बदलातून स्त्रियांनाही समाजामध्ये पुरूषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार टप्याटप्याने मिळत गेले. स्त्रियांच्या सहभागाशिवाय सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल शक्य नाही या जाणिवेतून स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीत सहभाग करून घेण्यास सुरुवात झाली. भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी विविध टप्यावर विविध संघटना कार्यरत होत्या. मात्र या संघटना विशिष्ठ वर्गापुरत्याच मर्यादित असल्याने व या संघटनेस बहुजनांचा पाठिंबा नसल्याने त्यांचे बळ वाढले नाही, त्यामुळे या चळवळीचे यश मर्यादित राहिले. मात्र १९२० नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीचा उदय झाला. गांधींनी प्रथम संपुर्ण देश पायी चालून भ्रमण केले त्यावेळीच त्यांच्या लक्षात आले की, खरा भारत खेडयात आहे व हा चळवळीपासून अनभिज्ञ व वंचित आहे. जोपर्यंत यांना चळवळीमध्ये सामावून घेतले जात नाही तोपर्यंत आपला प्रभाव व ताकद वाढणार नाही हे गांधीच्या लक्षात आले व त्यांनी शेतकरी, कामगार, महिला यांना आवाहन करून त्यांच्यात जागृती निर्माण केली. घराबाहेर न जाणाऱ्या स्त्रिया, नेहमी बुरखा वापरणाऱ्या स्त्रिया, तरूण माता, विधवा, अविवाहित मुली सर्वजण गांधींच्या प्रेरणेने चळवळीत सामिल झाल्या. आंदोलन, निदर्शने व मोर्चे काढून तुरूंगवास ही सहन करू लागल्या. कित्येक महिलांनी गांधीच्या या प्रभावातून आपले संपुर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले. आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नोंदविला. अशा स्त्रियांच्या कार्याचे मूल्यमापन करावे ही आजची गरज असल्याने प्रस्तुत लेखामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दक्षिण महाराष्ट्रातील काही ज्ञात व अज्ञात स्त्रियांच्या कार्याचे अवलोकन केले आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया आणि सबाल्टर्न दृष्टीकोन:
इ.स.१९८५ नंतरच्या काळात इतिहास लेखनाचा सबाल्टर्न दृष्टीकोन लोकप्रिय होऊ लागला. सबाल्टर्न गटाच्या इतिहासकारांनी वंचित किंवा दुय्यम समूहांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते राष्ट्रवादी दृष्टीकोनातून केलेले इतिहासलेखन हे ‘अभिजनवादी’ असते. त्यांचा आरोप होता की राष्ट्रवादी इतिहासकारांनी आपल्या मांडणीत ‘अभिजनवादी नेतृत्वाला’ खूप महत्त्व दिले. त्यांच्या इतिहासलेखनामध्ये स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या शेतकरी, कामगार, आदिवासी, तत्समजाती-जमाती आणि स्त्रिया यांच्या कार्याचा उल्लेख क्वचितच झालेला आढळतो. मात्र तळागाळातील समाजाच्या घटकांबद्दल लिहून त्यांना इतिहासात जागा मिळवून देण्याच्या हेतूने सबाल्टर्न इतिहासकार लिखाण करू लागले.
सबाल्टर्न गटाच्या इतिहासकारांनी स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात एक सैद्धांतीक मांडणी केली आहे. ती ही की, भारतीय स्वातंत्र्य लढा हा एकसंध स्वरूपाचा नव्हता. त्यांच्यामते राजकारणाची दोन क्षेत्रे होती- अभिजन क्षेत्र आणि सबाल्टर्न क्षेत्र. ही दोन्ही क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. अभिजन क्षेत्राकडून सबाल्टर्न क्षेत्राला नियमित/ नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जातात. म्हणजेच वास्तविक अभिजन लोकांनी वंचित व दुय्यम समूहातील लोकांचा ब्रिटीशविरोधी लढ्यात उपयोग करून घेतला. स्वातंत्र्यलढ्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यामध्ये कामगार, शेतकरी, आदिवासी या सारख्या दुय्यम आणि वंचित समूहांनी सहभाग घेतल्याचे दिसून येते. सबाल्टर्न गटाचे इतिहासकार सर्वजाती-जमातींच्या स्त्री वर्गाला देखील ‘सबाल्टर्न’ (वंचित, दुय्यमसमूह) समजत असल्यामुळे ही मांडणी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्त्रीवर्गाला देखील लागू होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासलेखनातील वंचितता:
भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिले आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आसुसलेले होते. त्यात महिलादेखील मागे नव्हत्या. त्यांनी आपल घर, कुटुंब ही जबाबदारी सांभाळताना स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग नोंदविला. ज्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला, त्रास सहन केला, त्या महिलांचे योगदान विस्मृतीत गेले आहे. अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी, अरुणा असफअली इ. प्रसिद्ध महिलांच्या कार्याचा उल्लेख मिळतो. पण प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरील बहुतांशी स्त्रियांना आजही इतिहासलेखनात अदृष्य ठेवले गेले आहे. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या शहराप्रमाणे तालुका, गाव, खेडे, वाड्या-वस्त्या, भटक्या आणि आदिवासींच्या जंगलापर्यंत विस्तारली होती. यात प्रौढ, तरुण, मुले ते अबाल वृद्ध स्त्री-पुरुषांचा समावेश होता. वसाहतवादी धोरण सुरु झाल्यापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही चळवळ सुरु होती. त्यामुळे भारतीय इतिहासावर या चळवळीचा दूरगामी परिणाम दिसून येतो. अभ्यासाच्या पातळीवर याचा साचेबद्ध अभ्यासही झाल्याचे दिसते. पण त्यातील अनेक महत्वाचे आणि कळीचे मुद्दे अभ्यासल्याचे दिसत नाही. अशाच काही महिलांबद्दल आज चिंतन होणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रियांची भूमिका:
स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात फारच थोड्या स्त्रियांचे उल्लेख मिळतात. १९०५ च्या वंगभंग आंदोलनानंतर स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. ऑगस्ट १९४२ च्या ‘भारत छोडो’ घोषणेनंतर प्रमुख राजकीय नेते तुरुंगात गेल्यावर ‘प्रत्येक नागरिकांनी आपण स्वतंत्र झालो आहे असे समजून स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रियाशील बनावे’ हा गांधींचा संदेश अनेक युवक युवतींना प्रेरणादायी ठरला. ही स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रिया पुरुषांप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला होता. या कालखंडातील अनेक स्त्रियांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी होती. या कालखंडात स्त्रिया स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होण्याचे प्रयत्न होण्यास सुरुवात झाली होती. भारतातील बहुतेक भागातील स्त्रिया स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत्या. कोणताच प्रांत स्त्रियांच्या चळवळीविना खाली नव्हता. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, बंगाल, आसाम, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश असे सर्वच प्रांत व त्यातील स्त्रिया स्वातंत्र्याच्या चळवळीत मुख्य भूमिकेत तर कधी सहकार्याच्या भूमिकेत सहभागी होत्या. त्यांचे संघटनाचे जाळे भारतभर पसरले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्षात भाग घेतलेल्या या स्त्रियांनी तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मुला-बाळाला आधार देणे, त्यांचे संसार चालविणे, क्रांतीकारकांना आपल्या घरात आश्रय देणे, निराधार लोकांना अन्न-पाणी पुरवणे, संग्रामात आवश्यक असलेली शास्त्रांची ने-आण करणे, कैदेत असताना साक्षरता वर्ग घेणे, रझाकारांच्या छावण्या जाळणे, बंदुका चालवणे अशा प्रकारची कामे केली. आणि आशा प्रकारच्या मुक्ती आंदोलनात स्त्रियांनी आपला सहभाग नोंदविला.
महाराष्ट्रातील स्त्रिया आणि स्वातंत्र्यलढा:
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील आपणाला काही स्त्रियांची नावे माहित असतील. पण यापेक्षा खूप मोठ्या संख्येने स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियाचा सहभाग होता. यात आपण उदाहरणार्थ हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्त्रियांचे कार्य पाहिले तरी स्त्रियांचे कार्य आपल्या लक्षात येईल. या संग्रामाच्या काळात रुक्मिणीबाई विठ्ठल कोरडे यांनी इ.स. १९३१ च्या जंगल सत्याग्रहात सक्रीय सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली होती, तसेच त्या बरोबरच त्यांनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतल्याने इ. स. १९४१ मध्ये त्यांना ८ महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. १ ते ३ जून १९३८ रोजी हैद्राबाद मुक्ती संग्रामासाठी महाराष्ट्र परिषद संपन्न झाली. त्यात महिलांनी विशेष सहभाग नोंदविला. यात काशिबाई किर्लोस्कर, सुशीलाबाई दिवान, गौरी किर्लोस्कर, कमलाबाई किर्लोस्कर, इंदुबाई शर्मा, गोदावरी दास यांचे प्रबोधनकारी कार्य विशेष महत्वाचे आहे. अशा हजारो कार्यकर्त्या हैद्राबाद मुक्ती संग्रामात कळीची भूमिका निभावत होत्या.
१९३०-३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत विदर्भातील स्त्रियांनी महत्वाची कामगिरी पार पडली. बुलढाना, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील स्त्रियांनी म. गांधींच्या सांगण्यानुसार स्वातंत्र्याचे प्रचार दौरे काढले. दुर्गाबाई जोशी, रुक्मिणी कोरडे, इंद्राबाई गद्रे, कमलबाई रेगे, रमाबाई केळकर, उमाबाई देशमुख इत्यादी महिलांनी मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्यागृह इत्यादी सत्याग्रह करून मोठी कामगिरी केली. निफाड तालुक्यातील अयोध्याबाई लक्ष्मण मोरे यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भूमिगत राहून कार्य केले. अकोला येथील गोयांकाबाई यांनी सरकारने बेकायदा ठरविलेल्या काँग्रेस मैदानात जाऊन १९४२ च्या आंदोलनात राष्ट्रध्वज लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना त्याबद्दल सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. ऑगस्ट १९४२ च्या चळवळीत सोलापूर येथे द्वारकाबाई देशपांडे, सुमतीबाई शाह, जनाबाई जाधव, कलावंती भोसले यांचे कार्य महत्वाचे आहे. सुमतीबाई शाहच्या शाळेत शिकणारी विद्यार्थीनी राजमती पाटील यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उघडपणे सहभाग घेतला, त्यांना त्यात अटक झाली व येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. ही विद्यार्थिनी पुढे साताऱ्याच्या प्रतीसरकारमधील प्रसिद्ध क्रांतिकारक म्हणून पुढे आली.
९ ऑगस्ट १९४२ च्या आंदोलनाचा स्फोट मुंबईतून झाला. यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. केसरी साड्या परिधान करून मुंबईतील हजारो स्त्रिया चौपाटीवर जात होत्या, त्यांना गोऱ्या सोजीऱ्यानी अडविले आणि निशस्त्र स्त्रियांवर गोळीबार केला. काही स्त्रिया जागीच ठार झाल्या. पण त्यांनी आंदोलन थांबविले नाही. चिमूर गावात अशाच काही महिलांवर आणि शाळकरी मुलींवर लष्करी जवानांनी अत्याचार केले. याची न्यायालयीन चौकशी करणारी मागणी स्त्रियांकडून पुढे आली. डॉ. आंबेडकरांच्या आंदोलनात अनेक दलित स्त्रियां होत्या. काळाराम मंदिर प्रवेशाच्या वेळी मंदिर प्रवेशाच्या आड येणाऱ्या पुजाऱ्याला त्यांनी चांगलाच चोप दिला होता. भगतसिंह-राजगुरू-सुखदेव या क्रांतिकारकांच्या चळवळीत व आजाद हिंद सेनेत काही स्त्रिया होत्या. या स्त्रिया महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहेत.
स्वातंत्र्यलढ्यातील दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रियांची भूमिका:
भारतीय स्वातंत्र्यचळवळीत इंग्रज राज्यकर्त्यांनी वेगवेळ्या आरोपाखाली महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. त्यामुळे ब्रिटीशांच्या विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्वातंत्र्य चळवळ भक्कम करण्यास सुरु केले. पुढे या चळवळीला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. याचे पडसाद दक्षिण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी उमटले. सोलापूर, कोल्हापूर, पूर्वीचा सातारा आणि आत्ताच्या सांगली जिल्ह्यात प्रथम मोर्चे व नंतर भूमिगत चळवळ यास्वरुपात क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य चळवळ अव्याहतपणे सुरु ठेवले. स्वातंत्र्याच्या चळवळीत वेगवेगळ्या माध्यमातून तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मुला-बाळाला आधार देणे, त्यांचे संसार चालविणे, क्रांतीकारकांना आपल्या घरात आश्रय देणे, निराधार लोकांना अन्न-पाणी पुरवणे, संग्रामात आवश्यक असलेली शास्त्रांची ने-आण करणे, कैदेत असताना साक्षरता वर्ग घेणे, बंदुका चालवणे इत्यादी हजारो प्रकारची कामे स्त्रियांनी केली. या सर्व प्रकारच्या उपरोक्त सहकार्याने पुरुषांना पाठिंबा देवून स्वातंत्र्य चळवळीस मदत करण्याचे काम या ग्रामीण भागातील स्त्रियांनी केला.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सातारा जिल्हयातील क्रांतीकारकांनी केलेले कार्य हे भारताच्या इतिहासात एक सुवर्ण पान आहे. कारण भारतातील ब्रिटीश सत्तेविरूद्ध जी प्रतिसरकारे स्थापन झाली, त्या सरकारांचा लगेचच बीमोड झाला. परंतु, सातारा जिल्हयातील प्रतिसरकार स्वातंत्र्य मिळेपर्यंत कार्य रूपाने टिकून होते. जसे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांनी अनेक क्रांतीकारकांना साथ दिली, तसेच प्रतिसरकार चळवळीत स्त्रियांनीही आपल्या ताकदीनुसार क्रांतीकारकांना साथ दिली. ‘‘प्रतिसरकार चळवळीमध्ये राजुताई बिरनाळे, इंदुताई पाटणकर यांच्याप्रमाणे लक्ष्मीबाई नायकवडी, हौसाबाई पाटील, इंदुताई पाटील, गंगुबाई लाड, विजयाताई लाड, लिलाताई पाटील, जनाबाई, गुणाबाई, भामिर्थी गुरव अशी अनेक नावे घेता येतील. १९४३ ते १९४६ कालखंडात खानापूर, तासगांव, वाळवा, सांगली, आष्टा, बुधगाव मिरज हा सातारा जिल्हयातील भाग प्रतिसरकारच्या चळवळीने गाजला. खरे तर ही चळवळ ब्रिटीश सरकारच्या विरूध्द गनिमीकावाच होता.
सातारा जिल्हयातील भूमिगत कार्यकर्त्यांची बैठक ३ जून, १९४३ रोजी वाळवे तालुक्यातील कामेरी या गांवी घेण्यात आली. आणि ब्रिटीश सत्तेविरूध्द प्रतिसरकारची स्थापना झाली. प्रतिसरकारच्या स्थापनेपूर्वीपासून राजूताई पाटील ऐतवडे बु।।. यासारख्या स्त्रिया स्वातंत्र्य चळवळीत काम करीत होत्या. प्रतिसरकारच्या मार्गदर्शनाखाली भूमिगतांनी १९४२ ची चळवळ चालू ठेवली होती. या कामात नागनाथ आण्णांनी जी कामगिरी बजावली होती. त्याच नागनाथ आण्णांच्या आई क्रांतिमाता लक्ष्मीबाईंनी मोलाचे सहकार्य केले होते. ग्रामीण भागात प्रतिसरकारचे कार्य सुरू होते. प्रत्येक गावात, खेडयात क्रांतीकारकांबरोबर स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग होता. राजमती पाटील, लीला पाटील-कुंडल गट यांनी ग्रामीण भागात जाऊन मुक्ताबाई साठे, लक्ष्मीबाई पाटील, इंदुमती पाटील, सुभद्राबाई सावंत, इंदिराबाई देशपांडे इ. स्त्रियांच्या सहाय्याने प्रतिसरकारमधील सहभाग वाढविला. रामानंद भारती यांच्या नेतृत्वाखलीदेखील या स्त्रियांनी कार्य केले. क्रांतिवीरांगना लक्ष्मीबाई नायकवडी यांनी क्रांतिवीर नागनाथ आण्णा यांना प्रतिसरकारच्या प्रत्येक कार्यात नेहमीच साथ व संस्कार दिले. म्हणूनच प्रतिसरकाचा हा छावा क्रांतिवीर नागनाथ आण्णाचे कार्य सिध्दीस गेले.
इंदुमती पाटणकर या महाराष्ट्रातील कासेगाव येथील ग्रामीण भागात राहणार्या स्वातंत्र्यसैनिक आणि दीर्घकाळ ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या. इंदुताईंचे वडील दिनकरराव निकम १९३० पासून स्वातंत्र्य चळवळीत होते आणि सत्याग्रहासाठी तुरुंगात असताना ते कम्युनिस्ट झाले आणि भाई व्ही. डी. सारख्या कम्युनिस्ट नेत्यांना भेटले. इंदुताईंनी गावातील काँग्रेसच्या मिरवणुकांमध्ये भाग घेतला. पुढे ती राष्ट्रसेवा दलात जाऊ लागली. १९४२ मध्ये, इंदुताईंनी वयाच्या १६ व्या वर्षी आपले आई-वडिलांचे घर सोडले आणि १९४२ च्या ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्या. महिलांना संघटित केले आणि राष्ट्र सेवा दलाचा प्रचार व प्रसार केला. तिने हळूहळू १९४३ पर्यंत प्रतिसरकारच्या भूमिगत चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली आणि लढवय्यांकडे शस्त्रे नेली. त्यांनी आपले घर सोडले, गावोगावी जाऊन पूर्ण टाइमर म्हणून काम केले. बंदुका किंवा इतर शस्त्रे घेऊन, गरज पडल्यास पोलिसांचा सामना करण्यामध्ये इंदूताईंची भूमिका महत्वाची होती.
लिलाबाईं माळवदे यांचा जन्म ३०जुलै १९२० ला मिरजेच्या विनायक आणि आंबुताई पिसे यांच्या पोटी झाला. लहान वयातच वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह १९३३ मध्ये कोल्हापूर संस्थानातील रेंदाळच्या पितांबर माळवदेशी झाला. त्यांच्या घरी आचार्य भागवत, बाबासो खंजिरे, भाई माधवराव बागल अशा चळवळीतील नेत्याचे येणे जाणे असे. पितांबर माळवदे ही शालेय जीवनापासून गांधी चळवळीकडे आकृष्ट झाले होते. या राजकीय वातावरणाचा परिणाम सौ. लिलाबाई यांच्यावरही झाला. १९३९ मध्ये कोल्हापूर संस्थानात प्रजा परिषद चळवळ सुरु झाली. पितांबर माळवदे या चळवळीशी जोडले गेले. पोलिसांनी कोल्हापूर संस्थान प्रजा परिषद बेकायदा ठरवून संबंधित कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यावेळी ४ एप्रिल १९३९ मध्ये पितांबर माळवदेंनांही पकडले. जयसिंगपूर कोर्टात यासंबंधी केस चालली. त्यांना सहा महिने सक्त मजुरी आणि २०० रुपये दंडाची शिक्षा झाली. १९४२ मध्ये चलेजाव आंदोलन वेगाने साऱ्या भारतभर पसरले. इकडे पितांबर माळवदेंचे स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणे सुरु होतेच. पितांबर माळवदेंनी कोल्हापूरला काही सहकाऱ्यासमवेत रेसिडेन्सी बंगल्यावर मोर्चा काढला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नजर चुकवत तिथे तिरंगा फडकविला. त्यांना परत कैदेत टाकले गेले. पितांबर माळवदेंच्या गुप्त निरोपानुसार लिलाबाईनी काही स्त्री पुरुषांना मोर्चासाठी तयार केले आणि सहकाऱ्या समवेत कोल्हापुरातील रेसिडेन्सी बंगल्यावर मोर्चा काढला. लिलाबाईबरोबर असलेल्या रामचंद्र गिरीबुवा, दत्तात्रय विभुते, लक्ष्मण कदम यांना पोलिसांनी लॉरीत चढविले. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी करून आणि समज देऊन त्यांना सोडण्यात आले.
१० ऑक्टोबर १९४२ रोजी कोल्हापुरात शिवाजी पुतळ्याच्या जागी त्यावेळी माजी गव्हर्नर लेस्ली विल्सन याचा पुतळा होता. या पुतळ्यावर आंदोलक स्त्रियांनी अॅसिडमिश्रित डांबर फेकून विद्रुप केला. यामध्ये भागीरथीबाई तांबट, जयाबाई हावीरे यांच्याबरोबर लिलाबाई माळवदे सहभागी झाल्या होत्या. याप्रकरणी लिलाबाईना सहा महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यांची मुले लहान असल्याने कोर्टाची माफी मागून सोडण्याचा प्रस्ताव या महिलांपुढे ठेवला मात्र या स्वाभीमानी व स्वातंत्र्याच्या प्रेरणेने प्रेरित विचारामुळे त्यांनी कारावासात जाणे मान्य केले. १९४३ मध्ये लिलाबाई माळवदेनी कोल्हापुरात पुन्हा एकदा पिकेटिंग केले. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून कोल्हापूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवले. लिलाबाईना तीन महिने सक्तमजुरी व ५० रुपये दंड ठोठावला गेला.
ब्रिटिश सत्तेला त्यांनी विरोध केलाच शिवाय समाजातल्या अपप्रवृतीनाही त्यांनी विरोध केला. रेंदाळ गावात दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला शेरअली यांचा मोठा उरूस भरत असे. या उरुसात मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री होत असे हे थांबविण्याचा प्रयत्न लिलाबाईनी केला. दारू विक्रीच्या दुकानावर मोर्चा काढून दारू विक्री न करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कृत्याने पोलिसांनी त्यांना हातकणंगले कोर्टासमोर उभा केले. मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले. स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत लिलाबाईंचे हे कार्य सुरु राहिले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदानाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडून त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले तर स्वातंत्र्य दिनाच्या रौप्यमहोत्सवाच्या वेळी राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रत्नाप्पा कुंभार यांच्या हस्ते ताम्रपट देण्यात आला. पुढे त्या स्थानिक राजकारणात व समाजकारणात सक्रिय राहिल्या. अशा कर्तुत्ववान स्त्रीचे २४ जुलै १९९१ मध्ये निधन झाले.
भारतभर कोटयावधी देशबांधव स्वातंत्र्यलढयात उतरले. लाठीमार, गोळीबार, अटकसत्रांच्या बातम्या देशभर पसरल्या. सोलापूर यास अपवाद नव्हते. सोलापूरचे कस्तुरबाई दोशी यांच्याबरोबर राजमती पाटील, सुमतीबाई शहा या क्रांतिकार्यात सक्रिय बनल्या होत्या. सोलापूर शहरातील गंगुबाई किनरे यांना १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अटक करून १०० रु. दंड आणि एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा थोठवण्यात आली. अखेर त्यांचा जेलमध्ये मृत्यू झाला. शहरातील स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या स्त्रियांपैकी हौतात्म्य पत्करणार्या गंगूबाई किनरे ह्या सोलापूर जिल्ह्यातील ‘पहिल्या स्त्री हुतातम्या’ होत.
समारोप:
उपरोक्त विवेचनावरून भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील दक्षिण महाराष्ट्रातील स्त्रियाचे योगदान अधोरेखित होते. ज्या काळात ब्रिटीश सरकारच्या विरोधातील वातावरणात स्त्रियांनी आवाज उठवणे, आंदोलन करणे, लिहिणे, सरकार विरोधी घोषणा देणे, क्रांतीकारकांना मदत करणे खरेच धाडसाचे होते, ऐतिहासिक होते. त्यांची ब्रिटीश सत्तेच्या विरोधी कृती पारतंत्र्य मुक्तीची होती असे म्हणता येईल..
संदर्भ सूची:
१. माने रणजीत, (संपा)., भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचे योगदान, प्रकाशक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, २०१८
२. नदाफ हाजी, मुंबई इलाख्यातील स्त्रीमुक्ती व स्त्री अस्मितेचा अविष्कार: एकोणिसावे शतक, माने रणजीत, (संपा)., भारतीय स्वातंत्र्यलढ्यातीलत स्त्रियांचे योगदान, प्रकाशक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, २०१८
३. पाटील पद्मजा, इंदूमती नाईक: तेजस्वी स्वातंत्र्यसैनिक, मालती प्रकाशन, माणगांव,२००९, पृ. ६२-७२.
४. पाटील पद्मजा, भारतीय स्वातंत्रलढयातील क्रांतिकारी महिला राजमती पाटील, महावीर जयंती स्मरणिका, छिंद्वाडा, मध्यप्रदेश, १९९५, पृ. १९
५. तांबट प्रभाकर, ‘क्रांतीच्या ज्वाळे’, मधुश्री प्रकाशन, पुणे, २०१०
६. पाटील अवनीश, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रियांचे योगदान समजून घेताना, माने रणजीत, (संपा)., भारतीय स्वातंत्र्यलढ्यातीलत स्त्रियांचे योगदान, प्रकाशक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, २०१८
७. Mane Ranjit, (Ed) Contribution of Women in India's Struggle for Freedom, Principal, Dr.Babasaheb Ambedkar Mahavidyalaya, Peth Vadgaon, 2018
८. कुंटे ग.ग., स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृतिक मंडळ, मुंबई
९. https://en.bharatpedia.org.in/wiki/Indumati_Babuji_Patankar
१०. http://www.posterwomen.org/Posterwomen/?p=5743
११. News, Maharashtra (15 July 2017). "Indumati Patankar, freedom fighter dies at 91". Maharashtra Today. Retrieved 14 December 2019.
१२. https://www.lokmat.com/sangli/great-contribution-women-sangli-district-freedom-movement-a697/
१३. Khole Supriya, Nadaf Haji (Ed), Local History and Cultural Identity in India, Dnyanjyo Publication, Kolhapur, 2019
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home